कळतंय पण वळत नाही

--- अतुल साठे

निसर्गचक्रात बिघडलाय काही,
हे कळतंय पण वळत नाही.

विकासाची दिशा चुकतेय खरी,
पण बदलण्याची नाही तयारी.

शाश्वत जीवनशैली दिली सोडून,
विवेक व नितीमत्ता खाली गाडून.

वेदांनी सांगितले चार पुरुषार्थ,
आम्हास हवे फक्त काम व अर्थ.

धर्म व मोक्षाची कशाला बात?
आम्ही करू निसर्गावर मात.

संतुलन आधी ढळू देऊ,
मग थोडी मलमपट्टी करू.

विचित्र उपायांचा करू अवलंब,
रामेश्वरी आग, सोमेश्वरी बंब.

भूजल ऱ्हास दुष्काळाचे कारण,
आमचा इलाज, मोट्ठे धरण.

हवाय प्राचीन अरण्यांचं आवरण,
करतोय वृक्षतोड, विलायती वनीकरण.

वाढवाया हवा स्थानिक रोजगार,
आणणार बाहेरील प्रकल्प चार.

शहरांतील लोंढे रोखायला हवे,
आम्हाला दिसतात मतदारांचे थवे.

किरणोत्सर्गाला घालायचाय आवर,
आम्ही उभारू मोबाईल टॉवर.

रोखायला हवा वापर प्लास्टिकचा,
काथ्याकूट करू किती मायक्रॉनचा.

चंगळवाद पृथ्वीला नाही झेपणार,
आम्ही फक्त जिडीपी वाढवणार.

करावा कमी संसाधनांचा वापर,
चालवणार एसी, अंघोळीला शॉवर.

निसर्ग उपासक संस्कृति आपली,
कर्कश फटाक्यांनी बिघडली दिवाळी.

हवी सायकल व चालण्याची सवय,
फ्रिवे व फ्लायओव्हर आम्ही बांधतोय.

वापरावे कमी व पुन्हा-पुन्हा,
यूज अँड थ्रोचा आता जमाना.

विचारसरणी बदलण्याची आहे निकड,
पर्यावरण दिनाला फक्त बडबड.

उमजावा आम्हाला हा महत्वाचा मुद्दा,
जेव्हा कळेल आणि वळेल सुद्धा!

(© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे. संपर्क atulsathe@yahoo.com )

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..